मुंबई : अनेक चित्रपट, मालिकांतून आपल्या अभिनयाची छाप सोडलेला सुपरस्टार अभिनेता स्वप्नील जोशी आता टेलिव्हिजन निर्मितीमध्ये उतरला आहे. त्याची निर्मिती असलेली ‘नकळत सारे घडली’ ही मालिका २७ नोव्हेंबरपासून स्टार प्रवाहवर सुरू होत आहे. मालिकेचा प्रोमो नुकताच सादर झाला असून, एक रंगतदार प्रेमकहाणी या मालिकेत पहायला मिळेल असा अंदाज त्यावरून येतो.या प्रोमोला सोशल मीडियामध्ये उदंड प्रतिसाद मिळत असून, हा प्रोमो स्वप्नीलने ट्विटही केला. सिने आणि टेलिव्हिजन क्षेत्रातील, स्वप्निलच्या मित्रमंडळींनं त्याला भरभरून शुभेच्छा दिल्या. स्वप्नीलने अर्जुनसिंह बरन आणि कार्तिक निशानदार यांच्या जीसीम्स या निर्मिती संस्थेत सहभागी होत,या मालिकेची निर्मिती केली आहे .
स्टार प्रवाहने आपल्या मालिकांतून कायमच नवे आणि वेगळे विषय सादर केले आहेत. ‘नकळत सारे घडले’ ही मालिकाही त्याला अपवाद नाही. छोटी मुलगी, तिचे बाबा आणि डॉक्टर आंटी यांच्यातले विलक्षण नाते यात पहायला मिळत आहे. हरीश दुधाडे ,नुपूर परूळेकर आणि बाल कलाकार सान्वी रत्नलिकर हे मुख्य कलाकार आहेत.
याबाबत स्वप्नील म्हणाला, ‘निर्मिती करण्याचा विचार बऱ्याच काळापासून माझ्या मनात होता. माझं आणि स्टार प्रवाहचं जुनं नातं आहे. म्हणूनच, स्टार प्रवाहबरोबर मालिका करायला मी खूप कम्फर्टेबल असतो. ‘नकळत सारे घडले’ या मालिकेच्या रुपानं हा विचार प्रत्यक्षात आला आहे. आजवर प्रेक्षकांनी माझ्यावर खूप प्रेम केलं आहे. तसंच या माझ्या नव्या कलाकृतीवरही करतील याची खात्री आहे.’